अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या डागडूजीसाठी ४३ कोटींचा निधी मंजूर
अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी 43 कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाने मंजूर केला आले.
अंबरनाथ- अंबरनाथ शहरातील १ हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन शिवमंदिराच्या विकासासाठी 43 कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाने मंजूर केल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या शिवमंदिराचा विकास आराखडा मंजूर करून घेण्यापासून ते निधी मिळविण्यापर्यंत घेतलेल्या परिश्रमाला यश आल्याबद्दल डॉ. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हला सुरूवात -
दरम्यानच्या काळात एकीकडे विकासनिधी आणण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षांपूर्वी अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हल सुरू करण्यात आला. जागतिक किर्तीच्या गायक आणि संगीतकारांनी या फेस्टिव्हलला सुरुवात केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही अंबरनाथ आर्ट फेस्टिव्हलला आपली उपस्थिती दर्शविली होती. फेब्रुवारी महिन्यात, कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेत देखील राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी अंबरनाथ फेस्टिव्हलचा उल्लेख केला होता. एखाद्या तीर्थक्षेत्राचा विकास करायचा असेल, तर स्थानिक लोकप्रतिनिधीने मनावर घेतले पाहिजे आणि त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना आपण एकदा फोनवर अंबरनाथच्या शिवमंदिराच्या संदर्भात सूचना केल्या आणि वर्षभरात त्यांनी या परिसराचा कायापालट केला. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी आपआपल्या मतदारसंघातील तिर्थक्षेत्राचा विकास अंबरनाथ येथील शिवमंदिराच्या धर्तीवर करायला हवा, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यावेळी सांगितले होते.
असा असेल विकास आराखडा -
अंबरनाथ शिवमंदिराचा विकासआराखडा दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये खर्च होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 23 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पहिल्या टप्पात आरक्षण क्रमांक 171मधील जागेत प्रवेशद्वार व कमान उभारण्यात येणार आहे. तसेच बस स्टॉप विकसित करण्यात येणार असून जंतर-मंतर पार्क व दर्शनी भागाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याच ठिकाणी भव्य अशी पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी सुरुवातीला नऊ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये दुसऱ्या भागात वालधुनी नदीचे संवर्धनही करण्यात येणार आहे. तसेच अंबरनाथ शहराच्या बाजूने मंदिराकडे जाणारे व येणारे दोन नवीन टेनसाईल सस्पेंडेड ब्रिज उभारण्यात येणार आहेत. यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या भागात आरक्षण क्रमांक 172 या जागेत असणाऱ्या पुर्वीपासूनच अस्तित्वातील प्राचीन कुंडाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. तसेच सध्याच्या पडीक उपहारगृहाचे पॅव्हेलियनमध्ये नूतनीकरण करणे तसेच अँफी थिएटर व संलग्न विद्युत व्यवस्था उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पूर्वीपासून अस्तित्वातील असलेल्या वसाहतीच्या बाजूला रिटेनिंग वॉल बांधण्यात येणार असून त्याच ठिकाणी फुल मार्केट उभारण्यात येणार आहे. या सर्व कामांसाठी आठ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये आरक्षण क्रमांक 169मधील जागेत पूर्वीपासून अस्तित्वात असलेले खेळाचे मैदान विकसित करण्यात येणार आहे. तसेच टेनसाइल रूफ उभारण्यात येणार आहे. यातच दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या शिवमंदिर महोत्सवासाठी पायाभूत विकासकामे जसे की, मत्स्यालय व फार्मर्स प्लाझा देखील उभारण्यात येणार आहे. यासाठी साडे आठ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. टप्पा क्रमांक दोनमधील दुसऱ्या भागात आरक्षण क्रमांक 173च्या जागेत प्रदर्शन मैदान उभारण्यात येणार आहे. यानंतर या परिसरात सिमेंट कॉंक्रिट रस्ता तयार करण्यासाठी आणि संग्रहालय उभारण्यासाठी पाच कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे तिसऱ्या भागात आरक्षण क्रमांक 174च्या जागेत येणारा वालधुनी नदीचा किनारा विकसित करण्यात येणार आहे. किनारा संवर्धना सोबतच या ठिकाणी असलेल्या प्राचीन शिवमंदिराच्या पौरानिक अवशेषांचे प्रदर्शन क्षेत्र निर्माण करण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यानुसार अंतिम टप्प्यात वालधुनी नदीच्या किनारी सर्व भाविकांसाठी विरंगुळा घाट बांधण्यात येणार आहे.
इ.स. १०६० मध्ये मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख -
जागतिक सांस्कृतीचा वारसा म्हणून ज्या २१८ कला संपन्न वास्तू युनोस्कोने जाहीर केल्या, त्यात भारतातील अती प्राचीन पुरातन मंदिराच्या यादीत या शिवमंदिराची नोंद आहे. शिलाहार राजा मुम्बानी यांच्या काळात इ. स. १०६०मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखांवर आढळतो.